Tuesday, October 4, 2011

स्वातंत्र्य : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

स्वातंत्र्य : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार
‘स्वातंत्र्य’या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.
स्वातंत्र्यास्तव मरण - अमरत्वाचे साधन
मृत्यूचा पाश कोणाला तोडावयाचा आहे का? काळाइतकेच अमर्याद अमरत्व कोणास पाहिजे आहे काय? असेल तर एक उपाय म्हणजे स्वदेशस्वातंत्र्याच्या रणांगणात त्याने हरहर म्हणावा! कधीही मरण न येण्याचे एक साधन म्हणजे स्वदेशस्वातंत्र्यास्तव तत्काळ मरण हे होय! - (१९०८ लं.बा., स.सा.वा. ४ : ८६)
स्वातंत्र्याची खरी स्फूर्ती हृदयात उत्पन्न झाली की -
ती शक्यतेकडे पाहात नाही. ती स्फूर्ती उदय पावली की मनुष्यास स्वदेश स्वातंत्र्यार्थ स्वत: जे काय करता येईल ते करुन टाकण्याची भयंकर प्रेरणा करते. - (१९२७ श्रध्दा. २३ जून)
स्वातंत्र्ययुध्दाचे सातत्य कसे टिकते ?
जेव्हा जेव्हा राष्ट्र आपल्या स्वातंत्र्यार्थ उठते, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याचे बीज त्या राष्ट्राच्या पूर्वजांच्या रक्तात रुजते, जेव्हा जेव्हा ते बीज त्या राष्ट्राच्या हुतात्म्यांच्या रक्तात रुजते, आणि जेव्हा जेव्हा पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्याकरिता एक तरी सुपुत्र त्या राष्ट्रात शिल्लक असतो तेव्हा तेव्हा अशा स्वातंत्र्ययुद्धाचा केव्हाही अंत होत नाही.
- (१९०७ पत्रक: करंदीकर शि.ल.: सावरकर चरित्र कथन १९४३ पृ. २०८-२१७)
वीरात्म्यांची योग्यता कशावरुन ठरते ?
... कोण मेला आणि कोण जगला ह्या रणघाईतील योगायोगावरुन हुतात्म्यांची नि वीरात्म्यांची योग्यता ठरत नाही. तर ती सद्समरात देहपतन होईतो किंवा विजय मिळेतो कोण लढत राहिला ह्यावरुन ठरते. -(१९५२ स.सा.वा. ८ : ४८३ )
स्वातंत्र्य हीच राष्ट्रीय देवता
... ते स्वदेशस्वातंत्र्य हेच आमचे ध्येय. ते स्वदेशस्वातंत्र्य हाच आमचा राजकीय धर्म, स्वदेशस्वातंत्र्य हीच आमची राष्ट्रीय देवता ,आमचा राजकीय देव, आमची ऐहिक उन्नती, आमचा मोक्ष. -(१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : १८०)
आम्हास स्वतंत्रता का हवी होती ?
इंग्रजांसुध्दा अखिल मनुष्यमात्राचे कल्याण व्हाचे म्हणून, मानुषकाचा परम विकास व्हावा म्हणून आम्हांस स्वतंत्रता हवी होती. मनुष्याची आत्मिक उन्नतीच नव्हे, तर मानसिक उन्नती, नैतिक उन्नती आणि आत्मिक उन्नतीही राजकीय पारतंत्र्याने खुंटते म्हणून आम्हांस भारताची राजकीय स्वतंत्रता हवी होती. तीस कोटी मनुष्यांच्या माणुसकीचा विकास अवरुध्द करणारे भारताचे राजकीय पारतंत्र्य मनुष्य जातीच्याही अध:पतनास कारण होणार असल्यामुळे त्याचा उच्छेद, शिरच्छेद करणे हे आम्ही आमचे राजकीय कर्तव्यच नव्हे तर धार्मिक कर्तव्यही समजत होतो. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : २४९)
उभ्या भारताची मुक्तता
ब्रिटिश भारत, पोर्तुगीज भारत, फ्रेंच भारत - इत्यादी शब्द ऐकताच आमची मान लाजेने खाली गेली पाहिजे. नेपाळपासून सिंहलापर्यंत, सिंधूपासून सिंधूपर्यंत हे भारत एक अखंड अविभिन्न आणि अविभाज्य आहे ! त्या उभ्या भारताची आम्ही मुक्तता करु इच्छितो. - (१९२८ श्रध्दा. १ मार्च )
राजकीय स्वातंत्र्यावाचून राष्ट्रीय जीवन असंभव
राजकीय स्वातंत्र्यावाचून राष्ट्रीय जीवनाच्या ह्या कोणत्याही घटकांचे (स्वभाषा, साहित्य, इतिहास, व्यापार इ.) अस्तित्वही शक्य नाही, मग परिपोष कुठला ?
- (१९४९ मा.आ., स.सा.वा १ : १८०, १८१ )
भारत भूमीवर दुसर्‍यांचा नांगर फिरला की -
परमेश्वराने तुला भारतभूमीसारखी शेती दिली आहे. त्या विस्तीर्ण शेतीला गंगा, यमुना,गोदावरी, कावेरी, सिंधू व ब्रह्मपुत्रा हे अखंड कालवे देवाने तयार करुन ठेवले आहेत. ह्या दिव्य शेतीत ह्या अखंड कालव्यांच्या सहाय्याने तुझ्या पूर्वजांनी धान्यच नव्हे तर प्रत्यक्ष सोने पिकविले आहे ! परंतु देवाने ह्या शेतीच्या करारात एक शर्त घातली आहे. ती ही की, ही शेती तूच नांगरली पाहिजेस. तूच ही शेती करशील तर हीत सोने पिकेल. परंतु दुसर्‍याचा नांगर हिच्यावर फिरला की हीत प्लेग पिकेल, दुष्काळ पिकेल, पारतंत्र्य पिकेल ! मग हा नांगर बाल्फर २ चा असो की मोर्ले ३ चा असो. ही देवाची शर्त तू पाळलीस तर हिंदुस्थाना पुढच्या हंगामात तुझ्या ह्या दिव्य शेतीत पाऊस पडो किंवा न पडो कोहिनूर पिकतील, मयुरासने पिकतील, शिवाजी पिकतील ! -(१९०६ लं.बा., स.सा.वा. ४ : ५२)
सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी स्वदेशस्वातंत्र्य आवश्यक
राजकारणातील अगदी प्रथम आधारभूत कर्तव्य म्हटले म्हणजे स्वदेश स्वातंत्र्य हे होय. मनुष्यजाती, स्वदेश, कुटुंब, व्यक्ती अशा पायरीने मनुष्याची कर्तव्यतारतम्यता आहे. या परंपरेच्या वाटयाला जी राजकीय कर्तव्ये आली आहेत त्यामध्ये स्वदेशस्वातंत्र्य हे प्रधानकर्तव्य आहेच आहे. परंतु राजकीय कर्तव्यासाठी केवळ नव्हे, तर इतर सर्व कर्तव्ये मनुष्याकडून यथास्थित रीतीने पार पाडण्यास स्वदेशस्वातंत्र्य आधी मिळविले पाहिजे. व्यक्तीची किंवा कुटुंबाची कर्तव्ये जर त्यांचा स्वदेश पारतंत्र्यात असेल तर कधीही यथास्थित चालावयाची नाहीत. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : ७)
स्वधर्म व स्वराज्य
स्वधर्माशिवाय स्वराज्य तुच्छ होय व स्वराज्याशिवाय स्वधर्म बलहीन होय. स्वराज्य ही ऐहिक सामर्थ्याची तरवार स्वधर्म ह्या पारलौकिक साध्यासाठी सदोदित उपसलेली असावी... - (१९०७ स.स्वा., स.सा.वा. ८ : ३३)
खरा धर्म मानव धर्म
इंग्लिशांचा इंग्लिश म्हणून आम्ही केव्हाही द्वेष केला नाही, करु दिला नाही. इंग्लंड हिंदुस्थानवर आततायी आक्रमण जोवर करीत आहे, तोवरच आमचे शत्रू. तो आततायीपणा त्यांनी सोडताच ते आमचे मित्रच आहेत. कारण मनुष्यमात्र एक आहे, आपला बंधू आहे. इतकेच नव्हे , तर इंग्लंडच्या न्याय्य स्वातंत्र्यास जर कोणी दुसरे आततायी राष्ट्र अन्यायी दंडेलीने तुडवू पाहील तर आम्ही इंग्लंडच्या मुक्ततेस्तव असेच झटू, झुंजू ही आमची अनेक वेळा व्यक्तविलेली प्रतिज्ञा असे. आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानवधर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर अशी आमची अत्युदार भावना असे. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : २४८)
राष्ट्रीय पक्ष, नेमस्त पक्ष व क्रांतिकारक पक्ष
... हा निर्बंध (कायदा) वाईट आहे तो बदला, हा कर जाचक आहे, तो काढा अशी किरकोळ रडवी गार्‍हाणी किती दिवस करावयाची ! त्याच्या मुळावरच घाव घातल्यावाचून तो वृक्ष नष्ट होणार नाही. मग जर केव्हा तरी तो घाव घालावाच लागणार, तर त्यास आरंभ आजच का करु नये? जो कोणी आरंभ करील त्यास आपल्या प्राणांचे मूल्य द्यावेच लागणार, मग तो आरंभ आणखी शंभर वर्षांनी करा ना का ! तेव्हा तो प्रारंभ आजच करुन आपणच ते प्राणदानाचे मूल्य का देऊ नये ? या विषारी वृक्षाची पाने तेवढी वाईट आहेत ती खुडली पाहिजेत, मुळाशी आमचा वाद नाही हे म्हणण्यात 'राष्ट्रीय' पक्षाची चूक आणि त्या वृक्षाला जर आपण न दुखविता नुसत्या प्रार्थनांचे ओशट दूध घालीत राहिलो तर तो आपण होऊन अमृत वृक्षात रुपान्तरित होईल हे म्हणणार्‍या 'नेमस्तांची' चूक. ह्या दोन्ही चुका सारख्याच बुध्दिभ्रष्ट होतात. त्या दोन्हीही सुधारल्या पाहिजेत. त्यांस ते शक्य वाटत नसेल तर आपण ते शक्य करु या. कारण परवशतेचा विषारी वृक्ष सुधारण्याचा एकच मार्ग आहे नि तो म्हणजे त्याचे आमूलाग्र उन्मूलन. त्या वृक्षाच्या मुळाशीच आमचे खरे भांडण आहे. इंग्रजांचा इकडे येणारा अधिकारी वर्गच नव्हे तर इंग्रजी सत्ताच उलथून पाडली पाहिजे आणि ही गोष्ट स्पष्टपणे, ज्वालाग्राही भाषेत, बंदीगृहाच्या छपरावरुन नि फाशीच्या खांबावरुन गर्जत राहिल्यावाचून लोकांची हीन आणि क्लीब उपेक्षावृत्ती मावळून ते केव्हाही उठावयाचे नाहीत. कोणत्या तरी अत्युच्च, अतिभव्य, अतिदिव्य ध्येयास त्या भोवती त्यागाची आणि पराक्रमाची जाज्वल्य प्रभावळ पेटवून ती लोकांच्या दृष्टीसमोर धरल्यावाचून लोकांची मने आकर्षित होणार नाहीत. वैयक्तिक संसाराच्या चाकोरीतून ते तसल्या कोण्या बेभान, दिव्य ऊर्मीवाचून बाहेर येणार नाहीत. महान ध्येयाच्या प्रेमाने उन्मत्त झाल्यावाचून ते उसळून उठावयाचे नाहीत. - (१९४९ मा.आ., स.सा.वा १ : १७९, १८०)
लो. टिळकांचे आम्ही खरे निष्ठावंत अनुयायी
ते जे मनात बोलत, ते आम्ही गर्जलो. ते जेथे थांबत तेथून आम्ही पुढे सरु. ते नेते, ते राष्ट्राच्या एक पाऊल पुढे असत. पण त्यांना त्या पुढची पावले निर्विघ्नपणे टाकता यावी म्हणून आम्ही त्यांच्याही पुढे शंभर पावले जाऊन झुंजून आमच्या राष्ट्राच्या सशस्त्र दळभाराचा मार्ग निष्कंटक करण्याचे (सॅपर्स ऍण्ड मायनर्सचे) पुर:सर पथकाचे यत्न केले. जिथे त्यांची साधने बोथट होती तिथे अचानक त्याच साधनांच्या लोखंडास वितळवून आम्ही साधनांचे शस्त्र बनविले, बोथटपणास धार पाजली, म्हणूनच आम्ही त्यांचे खरे निष्ठावंत अनुयायी. कारण त्यांच्यापुढे धावून त्यांचे मनोगत, उद्दिष्ट सिध्दीस नेण्यास झटलो. ते खड्गाची मूठ होते. आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ ही जरी पाते होऊ शकत नाही तरी पाते हे मुठीच्याच आधारावर रणकंदनी लवलवते, पाते मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : १४९)
इंग्रज फारसे विसरले नाहीत, आम्ही फारसे शिकलो नाही
खरोखर गेल्या दीडशे वर्षात इंग्रजांच्या राजकर्तृत्वाच्या चिकाटीत आणि सैनिक धैर्यात जसा फारसा फरक पडला नाही. तसाच त्यांच्या त्या गुणांची पारख करुन त्या मानाने त्या विपक्षाची तोंड देण्याची सिध्दता कशी करावी हे न समजणार्‍या आमच्या वेडगळ भाबडेपणातही काही फारसा फरक झाला नाही. - (१९२७ मा.ज., स.सा.वा. १:५३८)
ज्यात स्वत्व राहील ते स्वराज्य
जर ह्या स्वराज्यात प्रत्येक धर्मपंथाचे स्वत्व राखिले जाणार आहे, तर मग त्यात हिंदुधर्माचेही स्वत्व योग्य प्रमाणाने आणि यथान्याय राखिले पाहिजे, नाही काय ? इतकेच नव्हे तर हिंदुस्थानातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश भाग ज्या हिंदूंचा आहे, त्यांचे स्वत्व ज्या स्वराज्यात इतर अत्यल्प किंवा अल्प अशा अहिंदू समाजांच्या स्वत्वाच्या अतिरेकी मागण्यांस बळी दिले जाते, ते स्वराज्य नव्हे. - (१९२७ हिं.पं., स.सा.वा. ३ : ५०)
एक धनी जाऊन दुसरा यावा अशी हिंदूंची इच्छा नाही. हिंदुस्थानच्या सीमेत जन्मला म्हणून एडवर्डचे जागी औरंगजेब आणावा येवढयासाठी लढा, युध्द करुन प्राण देण्यास हिंदू सिध्द झालेले नाहीत. यापुढे स्वत:च्या भूमीवर, स्वत:च्या घरात, स्वत:च स्वामी व्हावे अशी हिंदूंची इच्छा आहे. - (१९३० हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५४)
शब्दांनी मनुष्य कसा फसतो याचे उत्तम उदाहरण गांधीजींच्या शब्दात सापडते. ते म्हणतात, ''मी जिनांचे राज्यात सुखाने राहीन, कारण त्यांचे राज्य झाले तरी हे हिंदी राज्य आहे.'' हिंदी या शब्दाने कशी फसगत होते याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. येथे राज्य केलेले औरंगजेब वगैरे हिंदीच होते, मग त्यांच्याविरुध्द शिवाजी महाराजांना का उठावे लागेल ? .... हिंदुस्थानात राहणारे म्हणजे हिंदी तर येथले साप, विंचू, वाघ हेही सर्व हिंदीच होतील; पण आपण त्यांना तसे मानतो का ? - (१९४० स.सा.वा. ४ : ४९३)
स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास विकृत करु नका
समान ध्येयाकरिता इतर पक्षांतील देशभक्तांची सेवा मान्य करण्यास क्रांतिकारक नेहमीच सिध्द आहेत. परंतु त्यांच्या तथाकथित अहिंसक, तुरुंगभरतीच्या व स्वत:चा घात करुन घेणार्‍या कार्यक्रमामुळेच केवळ ब्रिटनने गुडघे टेकले व इतिहासात अभूतपूर्व शांततामय व रक्तहीन क्रांती झाली ह्या एका गटाच्या क्षुद्र व दिशाभूल करणार्‍या ढोंगाचे खंडण करणे क्रांतिकारकांचे कर्तव्य आहे. ह्या ढोंगातील प्रत्येक शब्द बुध्दिपूर्वक असत्य आहे. ह्या असत्यास आव्हान दिले नाही तर राष्ट्रात आत्मघातकी मूर्खपणा पोसला जाईल. हिंदी क्रांतिकारक चळवळीचा, उदाहरणार्थ सन १९०१ ते १९४७ पर्यंतचा विश्वसनीय इतिहास, जोपर्यंत त्या पिढीतील ज्यांनी चळवळ केली ती पिढी निघून गेली नाही , तोपर्यंत लिहिणे शक्य झाले तर हे साध्य करता येईल. - (१९४७ हि.स्टे., पृ. २०९)
इतिहासरक्षणाचे श्रेय काही अंशी शत्रुपक्षाला
सशस्त्र क्रांतिकारकांविषयी उल्लेख करण्यासही आमचे बहुतेक स्वदेशी ग्रंथकार थरकापत होते आणि स्वत:स 'अहिंसक' पक्षीय म्हणविणारे तर त्या क्रांतिकारक वीरात्म्यांचे नि हुतात्म्यांचे नामोल्लेखही करणे 'पाप' समजत असत नि अद्यापही समजतात. त्यामुळे क्रांतिकारक आंदोलनाचा काही तरी साधार इतिहास जो आज जिवंत राहू शकला आहे तो तितका तरी जिवंत ठेवण्याचे श्रेय रौलट रिपोर्टसारखी राज्यीय प्रतिवृत्ते ज्या ब्रिटिश प्रसिध्दीविभागाने छापली त्या आमच्या परकीय शत्रुपक्षालाच दिले पाहिजे. - (१९५२ स.सा.वा. ८ : ४६५)
ब्रिटिश गुप्तचरांची प्रतिवृत्ते सर्वस्वी विश्वसनीय नाहीत
... ब्रिटिशांच्या हिंदुस्थानातील काय किंवा इंग्लंडातील काय, शासनीय गुप्तचर विभागाची अधिकृत म्हणविणारी जी प्रतिवृत्ते आज प्रसिध्द झालेली आहेत किंवा जी प्रतिवृत्ते त्यांच्या लेखालयांत (रेकॉर्डमध्ये) पडलेली आहेत त्यांत मी वर दाखविल्याप्रमाणे अनेक प्रकरणी नि अनेक प्रमाणे भारतीय क्रान्तिकारकांच्या गुप्त चळवळींविषयी आणि रणकृत्यांविषयी चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे त्या ब्रिटिश शासनीय प्रतिवृत्ताच्या आधारावर काय तो आमच्या ब्रिटिशभारतीय स्वातंत्र्ययुध्दाचा इतिहास लिहिला जाऊ नये. नाहीतर त्यांच्यातील चुकीची माहितीही सत्य घटना म्हणून इतिहासातही नित्याचे घर करुन बसतील.
- (१९६५ श.शि.पृ. १५७)
सत्तान्तराच्या वेळी इंग्रजांनी वाटाघाटी कोणाशी केल्या ?
इंग्रजांनी त्यातल्या त्यात ज्या ज्या हिंदी पक्षांचे राजकीय धोरण प्रथमपासून तत्वत: भ्रांत, स्वभावत: भेकड, साधारणत: ब्रिटिशधर्जिणे, मुसलमानांपुढे चळचळ कापणारे आणि कशीतरी नि हाती येईल तितकीच राजसत्ता का होईना पण आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेण्यास आतुर झालेले आढळले, त्या पक्षांनाच हिंदुस्थानचे पुढारी म्हणून ब्रिटिशांनी मान्यता दिली आणि राजकीय सत्तान्तराविषयीची बोलणी सारी त्यांच्याशीच काय ती केली ! अर्थात हे पक्षही देशभक्तच होते. वैध नि नि:शस्त्र मार्गांनी का होईना पण त्यांनीही कष्ट केले होते. -(१९६३ स.सो.पा., स.सा.वा. ४ : ९६४)
स्वातंत्र्यप्राप्ती रक्तशून्य नाही
ही क्रांती रक्तशून्य नाही. १८५७ पासून तो १९४७ पर्यंत जे आपले लक्षावधी लोक सशस्त्र युध्दात मेले आणि आपण दुसर्‍यांचे मारले त्यांचे ते रक्त काय रक्त नव्हते ? विशेषत: ५७ पासून ते ९७ च्या काळात तर सबंध देशातील फाशीचे स्तंभ हे सतत रक्ताने ओले असत- असे असता ही क्रांती रक्तशून्य आहे हे म्हणणे धादांत खोटे आहे. एवढे मात्र खरे की जे रक्तशून्य क्रांती झाली असे म्हणतात त्यांचे कपडे शुभ्र आहेत ! - (१९५२ सा.हिं. २२ डिसेंबर)
स्वातंत्र्यार्थ प्राणांची पर्वा न करता यांनी त्याग केला म्हणूनच नि:शस्त्र प्रतिकारक सभासंमेलनाद्वारे प्रचार तरी करु शक ले. - (१९५२ सा.हिं. २२ डिसेंबर)
...त्यांच्या मते राष्ट्राचा इतिहास १९२० नंतर सुरु झाला ! मुलास आपल्या जन्मापासूनच जग सुरु झाले असे वाटत असेल तर वाटो; पण बापही माझ्यासमोर जन्मला असेच तो म्हणेल काय ? पट्टाभि सीतारामय्यांना७ हा इतिहास माहीत नाही, म्हणून तो घडलाच नाही असे का म्हणावयाचे आहे ? हेच का 'सत्य'? - (१९३९ स.सा.वा. ४ : ४०७)
स्वातंत्र्यसंपादानाचे श्रेय सामायिक
ब्रिटिशांच्या परदास्यातून भारताची मुक्तता करण्याचे नि स्वतंत्र नि सार्वभौम असे आपल्या भारताचे संघराज्य करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा नि:शस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते गेल्या दोन पिढयांतील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे. १८५७ च्या सशस्त्र क्रांतिकारकांचा वाटा तर त्यात आहेच आहे. पण त्यानंतरच्या देशभक्त दादाभाईंपासून देशभक्त गोखल्यांपर्यंतच्या नेमस्त म्हणविणार्‍या पक्षांतील सर्व कार्यकर्त्यांना ते श्रेय यथाप्रमाण मिळाले पाहिजे.
राष्ट्रीय किंवा जहाल म्हणून ज्या पक्षाला म्हणत त्यांचाही वाटा ह्या सामुदायिक श्रेयात आहेच आहे. स्वत:स असहकारवादी आणि अहिंसक म्हणवून घेणार्‍या सहस्त्रावधी देशभक्तांनी नि देशसेवकांनी ह्या राष्ट्रीय स्वातंत्र्यास्तव जे भारतव्यापी कार्य केले, त्याविषयीही आम्ही सर्वांनी कृतज्ञता व्यक्तविलीच पाहिजे. मी तर त्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की सशस्त्र वा नि:शस्त्र अशा कोणत्याही गुप्त वा प्रकट चळवळीत सक्रिय भाग ज्यांनी घेतला नाही परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृद्यात एक सहानुभूती बाळगली आणि 'देवा, माझ्या भारताला स्वतंत्र कर' म्हणून अबोल प्रार्थना केल्या, अशा आमच्या लक्षावधी स्वदेशबांधवांच्या मूक शुभाशीर्वादांनाही आजच्या आपल्या ह्या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे. - (१९५२ क्रां. घो. पृ. ७१)
शुध्द सुखाची परमसीमा कोणती ?
जर जगात काही निर्मल सुखाचे क्षण असतील तर त्यांच्यात तो क्षण शुध्द सुखाची परमसीमा करणारा होय की, ज्या क्षणी आपल्या अत्यंत प्रिय देश जननीला ज्याने असह्य दु:ख दिले तो शत्रू मार खात देशाच्या हद्दीबाहेर पळून चालेला आहे हे पाहता येते. जर निर्भेळ धन्यतेचा एखादा दिवस असेल तर तो तोच होय की ज्या दिवशी देशजननीला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून रणांगणातून देशभक्त परत येत आहेत व त्या स्वातंत्र्यासाठी पतन पावलेल्या देशवीरांच्या आत्म्यांना संबोधून अशी गर्जना करीत आहेत की,''देशवीरहो, आपला देश स्वतंत्र झाला आहे !तुमच्या रक्ताचा सूड उगविला आहे.'' - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १९)
Add to Cart

Related Product :

0 comments:

Post a Comment

Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. HINDU LEDGER - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger